मुंबई : राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयाप्रमाणेच मुंबईवरही भाजप व महायुतीनेच झेंडा रोवला आहे. मुंबईवर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र ते मोडीत काढून महायुतीला २२ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळाल्याने भाजपने आता मुंबईही काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशावर मात करून महायुतीने यश प्राप्त केले.
लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला मोठे यश मिळाले होते. महायुतीचे उमेदवार पियूष गोयल हे उत्तर मुंबईतून तर शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र वायकर हे वायव्य मुंबईतून विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीने सहापैकी चार जागा पटकावल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील अपयश महायुतीने धुऊन काढले. भाजपचे उमेदवार १५ तर शिवसेनेचे सहा जागांवर विजयी झाले आहेत. मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा हे तब्बल सातव्यांदा सलगपणे निवडून आले असून त्यांनी ७२ टक्क्यांहून अधिक मते मिळविली, तर कालिदास कोळंबकर हे नायगावमधून नवव्यांदा विजयी झाले. मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार हे वांद्रे (प.) मतदारसंघातून १९,९३१ मतांनी विजयी झाले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कांदिवलीतून अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर, विलेपार्लेतून पराग अळवणी, गोरेगावमधून विद्या ठाकूर आदी भाजप आमदार पुन्हा निवडून आले. काँग्रेसला मुंबईत तीन जागांवरच समाधान मानावे लागले. त्यात मालाड (प.) मतदारसंघातून अस्लम शेख, धारावीतून ज्योती गायकवाड आणि मुंबादेवीतून अमीन पटेल यांचा समावेश आहे.
शिवसेनेला (उद्धव ठाकरे) १० जागांवर विजय मिळाला असून माहीम, शिवडी व वरळीमध्ये अटीतटीची लढत झाली. वरळीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने चंग बांधला होता. पण ठाकरे गटाने नेटाने किल्ला लढवत ही जागा राखली.



