मुंबई: देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्रसरकार त्यांना आता २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे.
अनेकदा रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास इतर वाहनचालक तो अपघात पाहूनही तिथे न थांबता आपल्या मार्गाने निघून जातात. पोलिसांना या अपघाताची माहितीही देत नाहीत. कारण पोलीस कारवाईत अडकवतील अशी त्यांना भीती असते. अनेकांना मदत करायची असते मात्र पोलीस आपल्याकडेच चौकशी करतील, त्याचा नाहक मनस्ताप होईल म्हणूनही ते अशावेळी मदत करीत नाहीत. दरम्यान लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५ हजार रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम ५ हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे.
मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आत्ता देखील अशा प्रकारचे बक्षीस दिले जात आहे. परंतु त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस दिले जाईल असे नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.



