नेमकं काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या बाबतीत संभ्रमअवस्था तर तयार झालीच आहे शिवाय शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढू लागली आहे.

विरोधकांची सरकारवर टीका

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी विविध आश्वासाने दिली होती. यामध्ये महायुतीनं त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं महत्वाचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होतं. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळं या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली होती. हा फक्त चुनावी जुमला होता असं ते म्हणालेत. आता त्यांच्या या टीकेला भाजप काय प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.