मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण जोडप्यांना एक अजब आवाहन केले आहे. चार मुलांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना ते एक लाख रुपये रोख देणार आहेत. रविवारी इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना राजोरिया यांनी ही घोषणा केली. ‘सध्या जोडप्यांचा कल एकच मुल जन्माला घालण्याकडे असतो, पण सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्म घालावा’, अशी अपेक्षा राजोरिया यांनी यावेळी व्यक्त केली.

कॅबिनेट दर्जा प्राप्त असणारे राजोरिया म्हणाले की, परशुराम कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलो तरी एक लाख रुपये रोख देण्याचा पुरस्कार मी माझ्या वैयक्तिक पातळीवर जाहीर करत आहे. या कार्यक्रमानंतर इंडिया टुडेशी बोलताना राजोरिया म्हणाले की, ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म देणे आता गरजेचे आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे करावेच लागेल.

विष्णू राजोरिया पुढे म्हणाले, युवक तक्रार करतात की, शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळे युवा जोडपे एकाच मुलाला जन्म देऊन थांबतात. पण यामुळे अनेक अडचणी उत्पन्न होत आहेत. मी तरुण जोडप्यांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कसेतरी दिवस काढावेत. पण मुलं जन्माला घालण्यात मागे राहू नये. ज्येष्ठांकडून तर काही अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणून मी तरुण जोडप्यांना आवाहन करत आहे. तरुणच आपल्या पुढच्या पिढ्यांचे संरक्षण करू शकतात, त्यामुळं त्यांनी चार मुलांना जन्म घालावा.