
तब्बल 12 वर्षांनंतर म्हणजेच येत्या 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. महाकुंभ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये देश-विदेशातून लाखो लोक सहभागी होतात. हा मेळा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी दर 12 वर्षांनी भरतो. यावेळी प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू होत आहे.
केवळ भारतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे धुऊन मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. आता तुम्हीही कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही यासाठी एखादे चांगले टुर पॅकेज शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
पुणे ते प्रयागराज खास ‘भारत गौरव ट्रेन’
भारतीय रेल्वे महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर अनेक विशेष गाड्या चालवत आहे. या पार्श्वभूमीवर खास ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू करण्यात आली आहे. ही विशेष ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे.तुम्ही पुण्यातून तेथे जाऊ शकता.
ही गाडी 15 जानेवारीरोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्यातून प्रयागराजसाठी निघणार आहे. याशिवाय प्रयागराजला जाण्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, छत्रपती संभाजीनगर-पटणा-छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
पुण्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या भारत गौरव ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट 22,940 रुपये आहे. तर 3AC तिकीट 32,440 रुपये आहे. तर, कम्फर्ट क्लास 2AC तिकिटाची किंमत 40,130 रुपये आहे. . या ट्रेनमध्ये 14 डबे आहेत, ज्यात 750 प्रवासी बसू शकतात. यामध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
काय सुविधा मिळणार?
पुणे ते प्रयागराजसाठी भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रयागराजमध्ये राहण्याची सुविधा मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या टेंट सिटीमध्ये प्रवाशांची सोय केली जाईल. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, एक सुरक्षा रक्षक आणि एस्कॉर्ट सेवा असेल. तसेच फक्त शाकाहारी जेवण मिळेल.
‘या’ स्थानकांवरून धावणार विशेष गाड्या
भारतीय रेल्वेने महाकुंभासाठी 7 राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.



