पुणे : राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करूनही आतापर्यंत ३९ परीक्षा केंद्रांवर १५४ गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यातील १०४ इतक्या सर्वाधिक कॉपी प्रकरणांची नोंद छत्रपती संभाजीनगर विभागात झाली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४२ गैरप्रकार उघडकीस आले. आतापर्यंत बारावीच्या परीक्षेत पुणे विभागातील सहा केंद्रांवर १८, नागपूर विभागातील दोन परीक्षा केंद्रांवर तीन, अमरावती विभागातील तीन परीक्षा केंद्रांवर सहा, नाशिक विभागातील पाच परीक्षा केंद्रांवर नऊ, लातूर विभागातील तीन परीक्षा केंद्रांवर सात, तर कोकण विभागातील एका परीक्षा केंद्रावर एका गैरप्रकाराची नोंद झाली आहे. एकूण १५४ गैरप्रकारांतील १०४ गैरप्रकार छत्रपती संभाजीनगर विभागातील १७ परीक्षा केंद्रांवर नोंदवले गेले आहेत. बारावीचे आणखी काही पेपर होणे बाकी आहेत. त्यामुळे परीक्षा संपल्यावर गैरप्रकारांची अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल.
‘यंदा पहिल्यांदाच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखरेख करण्यासाठी ड्रोन कॅमेरे वापरण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही करण्यात आली. गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेच्या काळातील गैरप्रकारांची तपासणी करून भरारी पथकांनी पकडलेल्या गैरप्रकारांबाबत परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे,’ असे गोसावी यांनी स्पष्ट केले.



