
मुंबई : अटल सेतूचा वापर सुरू झाल्यानंतर काही काळातच तेथून समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचे प्रकार सातत्याने घडले होते. आता वरळी येथील कोस्टल रोड – सीलिंक कनेक्टरवर मोटरगाडी उभी करून ३० वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सागरी सेतू परिसरात तरूणाचा मृतदेह बुधवारी सापडला असून याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत तरूण मालाड येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोस्टल रोडला वांद्रे – वरळी सागरी सेतूशी जोडणाऱ्या कनेक्टरच्या पोल क्रमांक ८० च्या शेजारी एक मोटरगाडी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास उभी करण्यात आली होती. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासणी केली असता एक व्यक्तीने तेथून उडी मारल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बोटीच्या साहाय्याने सर्वत्र शोध घेतला, पण रात्र झाल्यामुळे काहीच सापडले नाही. अखेर मोटरगाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी माहिती घेतली असता दर्शीत राजूभाई सेठ (३०) हा तरुण मोटरगाडी घेऊन तेथे गेल्याचे समजले.
