छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनागोंदी, जातीयवाद यांवर उपाययोजना करण्यासाठी मुक्कामाचा वेळ काढेन. तसेच जिल्ह्यातील राख, वाळू आणि भूखंडमाफियांना सुतासारखे सरळ करेन, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पुन्हा प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला. पुढील काही दिवसांत बीडमध्ये सुधारणा करण्यासाठी अगदी मुक्कामाचा वेळ काढेन, असेही ते म्हणाले.
परळीतील राखेतील गैरव्यवहारात काय पावले उचलली गेली, असा प्रश्न विधानसभेत चर्चिला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पालकमंत्री म्हणून बुधवारी दुसरी बैठक घेणार आहेत. जिल्हा नियोजनातील निधीवाटपावरून त्यांनी नेमलेल्या उपजिल्हाधिकारी भोर समितीचा अहवालही अद्याप गुलदस्तात आहे. सौर आणि पवन ऊर्जा या क्षेत्रातील आढावा उपमुख्यमंत्री घेणार आहेत का, या विषयी अधिक उत्सुकता आहे. परळी औष्णिक वीज केंद्रातील अंतर्गत बाबी ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येत असले, तरी या केंद्रांच्या भोवती असणारे राखेचे अवैध साठे, त्याची वाहतूक, यावर अद्याप कारवाई झाली नाही. ही कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या होत्या. बैठकीपूर्वी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी माफियांना, तसेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांना इशारा दिला. कोणी कितीही जवळचा असला आणि कामाचा दर्जा राखला नाही, तर त्याचे नाव काळ्या यादीमध्ये टाकू, असेही ते म्हणाले.
वाळूउपसा करणाऱ्यांना इशारा
बीडचे प्रशासन सुधारण्यासाठी अजित पवार कसे प्रयत्न करतात, याची उत्सुकता सर्वत्र असल्याने दुसऱ्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राख व अवैध वाळूउपसा करणाऱ्यांना इशारा दिला. या बैठकीस प्रकृती बिघडल्याने हजर राहता येणार नाही असे आमदार धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमातून कळवले होते. या मेळाव्यात चुकीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये स्थान नसल्याचे सांगत चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या. येत्या काळात बीडमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करावे याबाबतच्या सूचना घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, वकील आदींची स्वतंत्र बैठकही घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पालकमंत्री म्हणून कामाला वेग देऊच, पण बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावण्याचे कामही करू, असे पवार यांनी जाहीर केले.



