
सांगली : गोपीचंद पडळकर निश्चितपणे मंत्री होतील, पृथ्वीराज देशमुख खासदार, आमदार होतील, आम्हाला राज्यपाल तरी करा, अन्यथा आमची अवस्था वाजंत्र्यासारखी व्हायची, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल आणि जत विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल विट्यात आ. पडळकर यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. खोत बोलत होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे. यावेळी उपस्थित असलेल्या देशमुखांना ते म्हणाले, तुम्ही खासदारकीला मैदानात उतरा, आम्ही दोघे तुम्हाला खासदार करतो. गोपीचंद मंत्री व्हा, देशमुख आमदार, खासदार व्हा, मात्र, आम्हाला राज्यपाल करा. नाही तर आमची अवस्था वाजंत्री वाजवणाऱ्यासारखी व्हायची असे म्हणताच सभेत हशा पिकला. यावेळी ते पुढे म्हणाले, दोस्तीला गोपीचंद चांगला माणूस आहे, पण माणसे ओळखायला जमत नाहीत. आम्ही मात्र जनावरांची चांगली पारख करतो. एखादा माणूस जवळ आला की मी सावध करतो, मात्र गोपीचंद पटकन विश्वास ठेवतो. ते राजकारणात चालत नसते.
जयंत पाटील यांचे तळ्यातमळ्यात पडळकर
आ. पडळकर यावेळी म्हणाले, अमदार जयंत पाटील यांचे अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यांना आता गट, पक्ष कुणी विचारेना झाले आहे. त्यांचे कुठे जायचे हेच अजून नक्की होईना, मात्र आपल्या सर्वांच्या विरोधात ताकदीने लढायचे हाच त्यांचा प्राधान्यक्रम आहे. आता यापुढे भाजपशिवाय देशाला आणि सांगलीला पर्याय उरलेला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा रोवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



