मुंबई : साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांची रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहा, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी दोन आणि छत्रपती संभाजीनगरमधील एक, अशा पंधरा कारखान्यांना थकबाकी वसुलीची (आरआरसी) नोटीस काढली आहे.
साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे राज्यातील पंधरा साखर कारखान्यांनी आरआरसीची (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) नोटीस काढली आहे. सोलापूरमधील मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, गोकुळ शुगर्स लि. धोत्री, लोकमंगल अॅग्रो इंड लि. बिबीदारफळ, लोकमंगल शुगर इथेनॉल अॅण्ड को-जनरेशन इंड लि., भिमाशंकर शुगर मिल्स लि. पारगाव, जयहिंद शुगर्स प्रा. लि. आचेगाव, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर मिल्स लि. उत्तर सोलापूर, इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रा. लि., धाराशिव शुगर लि. सांगोला हे दहा कारखाने. अहिल्यानगरमधील स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इंड लि. नेवासा आणि श्री गजानन महाराज शुगर संगमनेर आदी पंधरा कारखान्यांची २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
समितीची फेररचना
आर्थिकदृष्ट्या आजारी, अवसायानात निघालेले सहकारी साखर कारखाने भागीदारी, सहयोगी, भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठीच्या समितीची फेररचना केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सहकार मंत्री असतील. सहकार राज्यमंत्री, सहकार विभागाचे प्रधान सचिव सदस्य असतील, तर साखर आयुक्त सचिव म्हणून काम करतील.


