
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत 75 वर्षांची निष्ठा संपुष्टात आणली. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या विशेष सोहळ्यात त्यांनी भगवा फडवला. कुणाल पाटील यांनी काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सेवा केली. त्यांच्या वडिलांनीही आमदार आणि मंत्री म्हणून काम पाहिलं. “आज 3 पिढ्यांचा वारसा बाजूला ठेवून, विकासासाठी हा निर्णय घेत आहे. फडणवीसांनी माझ्या मागील विरोधात असूनही कामे मंजूर केली. हेच नेतृत्व माझ्या खान्देशच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल,” असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
भाजपमध्ये येताना कुणाल पाटील यांनी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा विचार करत “मी अडथळा ठरणार नाही. तुमचं स्थान कायम राहील, मी सन्मानाने वागणूक देईन,” असा विश्वास दिला. त्यांनी आपल्या धार्मिक भूमिकेचंही उल्लेख करत सांगितलं की, “लाट आली तेव्हापासून मी जास्त देवपूजा करत आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी धुळे जिल्ह्यातून शेकडो समर्थक मुंबईत दाखल झाले होते. अनेकांनी घोषणाबाजी करत, कुणाल पाटील यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. “विकासासाठी योग्य निर्णय घेतला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कुणाल पाटील यांच्या या प्रवेशामुळे खान्देशात काँग्रेसला मोठं खिंडार बसणार आहे. विशेषतः धुळे-जळगावमध्ये भाजपचं बळ अधिक वाढेल, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेससाठी हा धक्का सावरणे सोपे जाणार नाही.


