पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘मी १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद इथं जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी मशिदीच्या भोंग्यांवर पुन्हा एकदा आक्रमक इशारा दिला आहे.
‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

