महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तसेच ती शूरवीरांची, विचारवंतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांच्या, समाजसुधारकांच्या मालिकेतील, महाराष्ट्रातील एक प्रमुख विचारवंत व समाजसुधारक म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख होत. ते एक समाज प्रवर्तक, थोर शिक्षणतज्ञ व शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते असून भारतातील एक कृतिशील, महान व्यक्तिमत्त्व होय.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर इ.स. १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. त्यांचे मूळ नाव पंजाब श्यामराव कदम आहे. त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव व आईचे नाव राधाबाई होते. डॉ. पंजाबरावांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले. त्यानंतर अनेक अडचणींना तोंड देऊन कारंजा व अमरावती येथुन माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इ.स.१९१८ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर ते इंग्लंड मधून उच्च शिक्षण घेऊन उत्कृष्टपणे उत्तीर्ण झाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांना मिळालेले यश सुखासुखी व सहज साध्य झालेले नव्हते. तर त्यासाठी त्यांना भरपूर त्याग करावा लागला होता.
त्यांनी “वैदिक वांड़मयातील धर्मांचा उद्गम आणि विकास” या विषयावर ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला. या संशोधनाबद्दल २५ जानेवारी इ.स.१९४५ रोजी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी सन्मानाने बहाल केली. अनेक विद्वानांच्या कसोटीत उतरणारे ज्ञान सामर्थ्य संपादन करून डॉ. पंजाबराव देशमुख एम.ए. ऑनर्स (संस्कृत), डॉक्टरेट, बार ॲट लॉ या बहुमोल विद्या पदव्यांनी विभूषित झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण घेऊन विदेशातून भारतात परतल्यानंतर त्यांनी समाज विकासासाठी केलेली सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कृषिविषयक कामगिरी विशेष महत्त्वपूर्ण आहे. “आधी केले, मग सांगितले” या उक्तीप्रमाणे ते जीवन जगले. त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीला जे पटले आणि त्यांना ज्यात समाजाचे हित दिसले ते त्यांनी पुढाकार घेऊन केले. त्यावेळी अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृहांची व्यवस्था होती.
परंतु जातीविरहीत समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री सदानंद वसतिगृह स्थापन केले. त्यात सर्व जातीच्या मुलांना एकत्र प्रवेश देऊन जातीव्यवस्थेला मूठमाती देण्याची धाडसी पाऊले उचलली. श्री सदानंद वस्तीगृहाच्या रूपाने डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली ही पहिली सामाजिक संस्था होय. ही एक प्रकारची त्यावेळची सामाजिक क्रांतीच होय. त्याचप्रमाणें डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर सहकार्यांच्या मदतीने त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा प्रभाव संपूर्ण विदर्भावर पडला. खेड्यापाड्यातून अस्पृश्यता निर्मूलनास मोठी चालना मिळाली. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मते, जातीतील अंतर कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह होय. सामाजिक सुधारणेचा प्रारंभ स्वतःपासूनच केला पाहिजे म्हणून त्यांनी कु. विमल वैद्य यांच्याशी आंतरजातीय विवाह करून समाजातील जातिभेदाला दूर सारण्याचा प्रयत्न केला. या विवाहावरून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार काळाच्या किती पुढे होते हे दिसून येते.
सामाजिक सुधारणांसोबतच डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिले. संपूर्ण विदर्भात शेतकऱ्यांसाठी फिरत असतांना स्वातंत्र्यासाठी लोकांना महात्मा गांधींच्या नेतृत्वाबाबत उत्कंठा निर्माण केली. तसेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी प्रचाराला व विदेशी बहिष्कारावर विशेष भर दिला. ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रत्येक चळवळीत सहभागी असून चळवळ उभारण्याचे प्रेरणाकर्ते, निर्माणकर्ते होते. शिक्षण व कृषी हे दोन क्षेत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे क्षेत्र होते. शिक्षण हे प्रगत, सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे एकमेव साधन आहे असे ते मानत होते. संपूर्ण समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा अंधकार, दुख, दारीद्र्य या मूलभूत समस्या दूर करायच्या असतील तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी अचूक ओळखले होते.
त्यासाठी त्यांनी १ जुलै इ.स. १९३२ रोजी अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. आज संपूर्ण विदर्भाच्या शैक्षणिक वाटचालीत मैलाचा दगड म्हणून भूमिका बजावणारी संस्था म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था ओळखली जाते. हे त्यांचेच महान कार्य होय. सोबतच स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. शिक्षणासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रातही फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचे एक सुत्र होते ते म्हणजे “कृषक विकास” होय. ज्याप्रमाणे संतांना माणसांत देव दिसला त्याप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुखांना शेतकऱ्यांमध्ये देव दिसला होता. ‘शेतकरी सुखी, तर जग सुखी’ हा मंत्र त्यांनी नुसता जपला नाही तर त्या दिशेने अभिजात कार्य केले होते. शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास हा त्यांचा श्वास होता. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी क्रमबद्ध पद्धतीने कार्य केले होते.
जगातील कृषी संघटनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संघटना किती प्रभावीपणे कार्य करू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ७ फेब्रुवारी इ.स. १९५५ रोजी भारत कृषक समाजाची स्थापना केली. भारतीय शेतकऱ्यांना प्रगत कृषी शिक्षण देणे व कृषीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे हे भारत कृषक समाजाचे उद्दिष्ट होते. भारतीय शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले. स्वतंत्र भारताचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील असेच आहे. इ.स. १९५२ ते इ.स. १९६२ या एकूण दहा वर्षे डॉ. पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे कृषिमंत्री होते. कृषिमंत्री असतांना त्यांनी दिल्ली येथे ११ डिसेंबर १९५९ ते ११ मार्च १९६० या काळात आपल्या कृषक समाजाच्या वतीने जागतिक कृषी संमेलन व प्रदर्शन भरवले होते. उद्याचा भावी कृषक, शेतकरी विज्ञानवादी कसा बनेल हा विचार त्यांनी या प्रदर्शनात केला होता. जगातील हे पहिलेच कृषी प्रदर्शन होते. याच काळात ती सर्वात मोठी ‘कृषिक्रांती’ घडून आली होती. म्हणूनच शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतीय कृषक क्रांतीचे जनक मानले आहे. तसेच भारत सरकारने देखील इ.स. १९८६ मध्ये ‘कृषिरत्न’ ही कृषी क्षेत्रातील सर्वाच्च मानाची पदवी देऊन त्यांच्या कृषिविषयक कार्याचा यथोचित गौरव केला होता. स्वतंत्र भारतातील ते पहिले ‘कृषिरत्न’ होत.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील कार्याने समाजाला व देशाला एक दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आपणास कठीण परिस्थितीतही मार्ग काढून जीवनात यश संपादन करण्यासाठी सतत दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. संपूर्ण समाजाला प्रगतीच्या उंच शिखरावर नेणारे थोर व्यक्तिमत्व कृषिरत्न, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
- डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
- शिरजगाव कसबा, जि. अमरावती
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)