महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. शिवसेनेनं काल आपल्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवलं होतं.
याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था मांजरांच्या पिल्लांसारखी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या पक्षाची मतं फोडण्याऐवजी दानवे यांनी आपल्या घरातील मत सुरक्षित ठेवावं. रावसाहेब दानवे यांचा मुलगाच आपल्याला मतदान करेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सत्तार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



