मुंबई : भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.
भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाला पहिल्या पसंतीची एकूण १३३ मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतानुसार प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली आहे.



