मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदार हे गुवाहटीमध्ये असले तरी आपल्या मतदार संघामध्ये काय सुरु आहे याची उत्सुकता त्यांना आहेच. हे सांगायचे कारण की गुवाहटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असतानाही सांगोला मतदार संघात काय सुरुयं हे जाणून घेण्यासाठी आ. शहाजी बापू पाटलांनी आपल्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि त्याचीच ऑडिओ क्लिप सध्या राज्यभर व्हायरल होतेय. कार्यकर्त्यासोबत राजकीय नेता किती मनमोकळा संवाद साधू शकतो हेच यामधून दिसून येते. शिवाय शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल आमदारांचे काय म्हणणे आहे. शिवाय त्यांच्याबद्दल आमदारांच्या काय भावना आहेत याचा लेखाजोखाच मांडला आहे. त्यामुळेच ही क्लिप जो तो कान देऊन ऐकत आहे. आजही उद्धव ठाकरे यांनाच आमदार हे देवमाणूस मानत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे ही वेळ आल्याचे आ. शहाजी पाटील यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे देवमाणूस पण..
नाराज आमदारांनी बंड केले असले तरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही प्रत्येक आमदाराच्या मनात आदर हा कायम आहे. आजही ते प्रत्येकासाठी देवमाणूस आहेत. पण हे असेच राहिले तर मात्र, आम्ही जगत नाही ही सगळ्यांची अडचण आहे. अडीच वर्षात आमच्या आमदारकी आणि मतदारसंघ सुध्दा राष्ट्रवादी ताब्यात घेतंय म्हणून प्रत्येकाच्या मनात भीती आहे. त्यामुळेच नेतृत्वाला आव्हान देणारं हे बंड उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अन् सुरतेची लढाई जिंकनार…..
बंडाची सुरवात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असली तरी सुरतेला पहिले पाऊल लागले ते आ. शंभूराजे देसाई आणि शहाजी बापू पाटील यांचे. त्यामुळे सुरतेची लढाई ही जिंकल्यात जमा आहे. दिवसेंदिवस नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. आमदारांच्या मनातील खदखद आता स्पष्टपणे बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आता सर्वच आमदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे सुरतेची लढाई जिंकली असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे.



