रत्नागिरी : आता शिवसेनेचं काय होणार? एकनाथ शिंदे काय करणार? उद्धव ठाकरे राजीनामा देणार? महाविकास आघाडीचं सरकार पडणार? शिवसेना भाजपसोबत सत्तेत बसणार? या अशा अनेक प्रश्नांसोबतच सध्या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली, रस्त्त्यारस्त्यावर आणि नाक्या-नाक्यावर चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातला राजकीय भूकंप आणि त्याचे पडसाद उमटत असताना एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पोस्टरबाजी करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातही पोस्टरबाजी झाली. त्यानंतर नागपुरात शिवसेनेच्या समर्थनात बॅनर लागल्याचं दिसून आलं होतं.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आशयाचेही बॅनर लागले. तर तिकडे अमरावतीत रवी राणांनाही मंत्रिपदाच्या शुभेच्छा देणार्या बॅनरची चर्चा रंगली होती. या सगळ्या राजकीय घडामोडींत आता कोकणातून एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बॅनर ना शिवसेनेनं लावलं आणि नाही एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी. हे बॅनर चक्क मनसेकडून लावण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी हा बॅनर लावले आहे.
कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा, अशा आशयाचा एक बॅनर सध्या चर्चेत आलाय. या बॅनरने रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांचं लक्ष वेधलंय. मनसेचे वैभव खेडेकर यांनी हे बॅनर लावलंय. खेडमधील या बॅनरवर ना राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, असं सफेद अक्षरांत लिहिलं गेलंय. तर ठाकरे ब्रँड वाचवा असं, ठळक भगव्या अक्षरांत लिहिलं गेलंय. हा बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.



