सोलापूर : एकनाथ शिंदेंनी ४० पेक्षा आमदार नेल्याचा दावा केला असून त्यात राज्याच्या मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्री आहेत. राज्यातील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आले आहे. मात्र, हे सर्व विधानसभेत सिद्ध करावे लागणार आहे, त्यामुळे कोरोनातून बरे होऊन राजभवनात दाखल झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात, असा सूर कायदेतज्ज्ञांमधून उमटत आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे ५५, काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर पाठिंबा दिला होता. त्यापैकी आता किती त्यांच्यासोबत राहतात, हे विधानसभेत बहुमत चाचणीच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, भाजपकडे १०६ आमदार असून काही अपक्षांचा त्यांनाही पाठिंबा आहे. महाविकास आघाडीकडे सध्या कागदावर तरी बहुमत आहे. आता सरकार अल्पमतात आल्याचे मानून राज्यपाल राज्य सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिध्द करायला लावू शकतात, अशीही चर्चा सुरु आहे.
बंडखोर आमदार हे २० जूनपासून राज्याबाहेर आहेत. यात काही मंत्रीही आहेत. त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील जनतेची कामे रखडली आहेत. बंडखोर आमदारांविरोधात व त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरत आहेत. काही आमदारांची कार्यालये फोडली जात आहेत. राज्यातील ही परिस्थिती पाहून राज्यपाल सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश देऊन हा राजकीय संषर्घ संपुष्टात आणू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.



