बंड केल्यानंतरचं एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे.
- शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून घमासान
गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसणार आहे.
अधिवेशनात गाजणाऱ्या मुद्दे कोणते असतील?
1) मुसळधार पावसानं केलेलं शेतीचं नुकसान
2) पूरपरिस्थिती
3) रखडलेले प्रकल्प
4) वादग्रस्त आमदार आणि मंत्री
5) राज्यावरचं कर्ज
6) मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
7) राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ.
17 ते 25 ॲागस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी
या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्याची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये रंगेल ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे. सत्तेत असताना महाविकास आघाडीची एकजूट आता विरोधी पक्षात आल्यावरही कायम असेल का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. जे चित्र विधानसभेत पाहायला मिळाणार तशीच आक्रमकता विधानपरिषदेतही दिसणार यांत काही शंका नाही. कारण एकनाथ खडसे यांच्या सारखा अनुभवी व आक्रमक नेता पुन्हा सभाग्रहात पुनरागमन झाले आहे.



