मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे. याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यालाही मंजुरी मिळाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभागृहात उपस्थित होते.
या ठरावांनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, आज छत्रपती संभाजीनगर, दि. बा. पाटील विमानतळाच्या नावाचे ठराव झाले. त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावं. आदित्य ठाकरेंच्या या मागणीनंतर याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.



