गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाकरे गट आणि शिंदे गटात प्रभादेवी येथे बाचाबाची झाली होती. या घटनेनं आता गंभीर वळण घेतलं आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली आहे. तसेच पोलिसांना बंदुकीतून सुटलेल्या गोळीची पुंगळीदेखील आढळली आहे. त्यामुळे आता या बंदुकीची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. याशिवाय पोलिसांनी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
हे प्रकरण आता आणखी चिघळत आहे. मात्र, प्रभादेवी राडा प्रकरणात नेमकं काय घडलं? सदा सरवणकर यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला का? असे अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी स्वत:च सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
आपण पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याचा प्रश्नच येत नाही. मी परवाना असलेली माझी बंदूक पोलिसांकडे जमा केली आहे. संबंधित प्रकरणात चौकशीसाठी आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.
सरवणकर पुढे म्हणाले की, गणेश विसर्जनाच्या दिवशी भक्तांचं स्वागत करण्याचा कार्यक्रम शिंदे गटाने आयोजित केला होता. मागील अनेक वर्षांपासून आम्ही असा कार्यक्रम आयोजित करतो. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. हे प्रकरण तिथेच मिटणं अपेक्षित होतं. मात्र, काही शिवसैनिकांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या घरावर हल्ला केला. संतोष तेलवणे यांना मारण्यासाठी जवळपास २५ शिवसैनिक जमा झाले होते. यामध्ये बहुतेक लोकं आमच्या ओळखीचे होते.
यामध्ये महेश सावंत, संजय भगत असे लोकं होते, हे सर्वजण संतोष तेलवणे यांना मारहाण करत होते, तेव्हा कुणीतरी आम्हाला फोन केला. संतोष तेलवणेला ३० ते ४० जणांचा ग्रुप येऊन मारहाण करतोय, अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही त्वरित प्रभादेवी चौकात गेलो, तेथून तेलवणे यांच्या घरी गेलो. या सर्व प्रकारानंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. त्यावेळी संतोष तेलवणे यांना मारहाण करणारे लोकं आणि इतर जनसमुदाय पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.
आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईपर्यंत बाहेरची गर्दी पोलीस ठाण्याच्या गेटपर्यंत आली. तिथे पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. हे सर्व दुर्दैवी होतं, आम्ही सगळे एकाच कुटुंबातील आहोत आणि आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी लहानाचे मोठे झालो आहोत. विसर्जनाच्या दिवशी एकमेकांना डिवचण्याचा जिथे प्रयत्न झाला, तिथेच हा वाद मिटायला हवा होता. पण हे प्रकरण घरापर्यंत जाणं शोभनीय नाही. परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे.



