पुणे – उस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज सोमवारी काढलेल्या मोर्चामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालक कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोमवारी शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चाचा परिणाम पुण्यातील वाहतुकीवर झाल्याचं दिसून आला आहे.
यावेळी डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, गोखले स्मारक चौक, खंडोजीबाबा चौक भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोटारचालक तसेच दुचाकीस्वारांना कोंडीत अडकून पडावे लागले. माेर्चासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याने या डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. त्यामुळे ड़ेक्कन जिमखाना भागात कोंडी झाली, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
सरकारने वेळीच कणखरपणा दाखवला नाहीतर, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, व सरसकट हेक्टरी 50 ह़जारांची मदत करा अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची ही लढाई आहे. ठरविक मागण्या मान्य करून पुढील लढाईसाठी तयारी करायची असते. महाविकस आघाडी सरकारने अन्यायकारक दोन ट्प्यांमध्ये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे, तो या सरकारने रद्द करावा अशी आमची मागणी आहे.
15 ऑक्टाेबर राेजी आम्ही ऊस परिषद घेऊन राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या. आतापर्यंत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हाेता परंतु महाविकास आघाडी सरकारने दाेन टप्प्यात शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारच्या काळातील सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला असल्याने त्यांनी शेतकरी हिताचा हा निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे.
मात्र, सरकार दुटप्पीपणाने वागत आहे. मागील वर्षभरात साखरेला चांगला भाव मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखरे शिवाय इथेनाॅल वाढविण्यास प्राधान्य देऊन त्यास ही प्राेत्साहनात्मक चांगला भाव दिला गेला आहे ताे कारखान्यांना मिळाला आहे.
त्यामुळे साखरेची 3100 रुपये प्रती क्विटल भावास 200 रुपये अधिकचे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्यात यावे मागणी आहे. साखर उद्याेगाला चांगले दिवस असल्याने आम्ही एफआरपीपेक्षा वाढीव पैसे मागत आहे. परंतु त्याबाबत सरकार, साखर कारखाने गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.




