पुणे : छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या भूमिकेवर ठाम आहे. मी केलेले विधान कोणाला द्रोह वाटत असेल तर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे शुक्रवारी दिले. माझी प्रत्येक भूमिका सर्वांना पटेल असे नाही. माझी भूमिका चुकीची ठरणारे हे कोण ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणे योग्य आहे, असे विधान अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केले होते. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलने केली होती. संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे, हा द्रोह आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर भूमिकेशी ठाम असल्याचा पुनरूच्चार करतानाच द्रोह असेल तर गुन्हा दाखल करा, असे आव्हान अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी जी भूमिका मांडली ते सर्वांच पटेल, असे नाही. मात्र, माझी भूमिका चुकीची आहे, हे ठरविणारे तुम्ही कोण, असे अजित पवार यांनी सांगितले. मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
मात्र, मी कोणता गुन्हा केला आहे. अपशब्दही वापरलेला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले. जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसे घडणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.



