मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. चालू आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे आलं तर ते सर्वजण अपात्र ठरतील, असं विधान झिरवळ यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवळ म्हणाले, “सत्तासंघर्षाचा निकाल काय येईल आणि कसा येईल? हे कोण ठरवू शकतो? शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. सत्तासंघर्षाचं प्रकरण पूर्णपणे माझ्याशी निगडीत आहे, असं तुम्ही आम्ही म्हणतो. मलाही वाटतं की ते प्रकरण माझ्याकडे येईल. पण ते प्रकरण माझ्याकडेच येईल, हे कोण पक्कं सांगू शकत नाही. यावर न्यायालय निर्णय घेईल.



