कर्नाटक : भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) ‘ऑफिस टू रिटर्न’ पॉलिसी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेत आहे. जे कर्मचारी एका महिन्यात किमान १२ दिवस कार्यालयीन काम पूर्ण करत नाहीत, त्यांना कंपनीने मेमो पाठवण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी रोस्टरचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ‘मेमो’मध्ये देण्यात आला आहे.
“तुम्हाला याद्वारे सावध केले जात आहे आणि तुमच्या कार्यालयाच्या ठिकाणाहून तत्काळ काम करण्यास सुरुवात करुत त्याचा अहवाल देणे अनिवार्य आहे असे निर्देश दिले आहेत,” असे मेमोमध्ये लिहिण्यात आले आहे.
TCS ही पहिली आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी वर्क फ्रॉम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावले. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारी ही एकमेव कंपनी आहे. इन्फोसिस सारख्या इतर कंपन्यांनी कर्मचार्यांना आठवड्यातून दोनदा येण्यास सांगितले आहे, परंतु अद्याप त्यासाठी सक्ती करण्यात आलेली नाही.
ऑक्टोबर २०२२ मध्ये, कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, व्यवस्थापक त्यांना आठवड्यातून तीन दिवस एक रोस्टर देईल, ज्याचे पालन त्यांना करावे लागेल. टीसीएसने कर्मचाऱ्यांना सांगितले की, वैद्यकीय आणीबाणीशिवाय घरून काम करण्याची संमती दिली जाणार नाही. रोस्टरचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा रजा कापण्यात येणार असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे. कार्यालयीन आवश्यकतेतून कामातून सूट देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्मचारी पाच दिवस अगोदर विनंती करू शकतात. एचआर कोणतेही मागील तारखेचा घरातून काम करण्याचा अर्ज स्वीकारणार नाही
मेमोवर टीसीएसचे मत
TCS म्हणाले, आम्ही आमचे कॅम्पस पुन्हा उर्जेने गजबजलेले पाहून उत्साहित आहोत आणि आमचे सर्व कर्मचाऱ्यांनी याचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा आहे. गेल्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने कर्मचारी TCS मध्ये सामील झाले आहेत. सहकार्य करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि एकत्र मजा करण्यासाठी TCS वातावरणाचा अनुभव घेणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशा प्रकारे संस्थेशी संबंधित असल्याची मजबूत भावना विकसित करणे आणि चांगले एकीकरण सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी भारतातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्यासाठी आणि आठवड्यातून तीन दिवस कामावर घालवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आमच्यापैकी बरेच लोक कार्यालयात परतल्याने याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. आम्ही सर्व सहयोगींना एका महिन्यात सरासरी आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयातून काम करावे, असे आमचे ध्येय आहे आणि आम्ही आमच्या सर्व गटांसह त्याच दिशेने काम करत आहोत. सर्वजण सहभागी होत आहेत.




