नवी दिल्ली: देशात विरोधकांचा एक गट अजूनही जुन्याच मानसिकतेचा आहे. ना स्वतः काम करतील आणि ना इतरांना करू देतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधानांनी रविवारी अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेचा आभासी पद्धतीने शुभारंभ केला. याअंतर्गत देशभरातील १,३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा समावेश असून, ही स्थानके २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.
विरोधकांवर नकारात्मक राजकारणाची टीका करताना पंतप्रधान म्हणाले, विरोधी पक्ष स्वतः काम करत नाही आणि आम्हाला काम करू देत नाहीत. जेव्हा आम्ही संसदेची नवीन इमारत बांधली, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी विरोध केला अशी टीका मोदी यांनी केली.
मतांचा विचार नाही
एका वर्षात ऑस्ट्रेलियाच्या एकूण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त रेल्वेमार्ग टाकण्यात आल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. आम्ही एका मिशनप्रमाणे सकारात्मक राजकारणाच्या मार्गावर आहोत. कोणत्या राज्यात कोणाचे सरकार, कोणाची व्होटबँक अशा गोष्टीचा विचार न करता आम्ही विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असेही ते म्हणाले.
तुम्ही दिलेला कर वाया जात नाही
एकेकाळी २ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागत होता. आता ७ लाख रुपयांचे उत्पन्नही करमुक्त आहे. करदाते वाढले आहेत. लोकांचा सरकार आणि देशाच्या विकासावर विश्वास असल्याचेच यातून दिसते.
–नरेंद्र मोदी, पंतप्रधान




