भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त करावयाच्या समारोहाचा भाग म्हणुन विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहातंर्गत स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून सुटका होणाऱ्या 186 बंद्यांना “गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे” आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (ता.15) साजरा करण्यात येणार असून , देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत.
“माफी योजनेचा उद्द्येश हा कैद्यांमध्ये शिस्त आणि आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे.”केंद्रीय गृह सचिवालयाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बंद्यांचे विशेष माफी योजनेसाठी पात्रता तपासण्यासाठी दिनांक 09जून 2022 च्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव(अ.व सु. ),गृह विभाग,मंत्रालय यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती.



