पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणूक लढवणे भाजपला परवडणार नाही, त्यांना केंद्रात पाठवा, अशी नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत व्यक्त झाली.
दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठांकडूनच पंकजा मुंडे यांच्या यात्रेला बळ देऊन फडणवीस यांच्याविरुद्ध सक्षम नेतृत्व उभे केले जात आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी पुण्यात केला.
डेक्कन येथील शिवसेना भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. शहरप्रमुख गजानन थरकुडे, महिला सेनेच्या पल्लवी जावळे, महेश मोगरे व निषाद पाटील उपस्थित होते. त्या म्हणाल्या, राज्यात भाजपबद्दल नकारात्मकता आहे. फडणवीसांंच्या नेतृत्वात निवडणुका जिंकू शकत नाहीत. म्हणून आरएसएसची बैठक महाराष्ट्रात झाली. छगन भुजबळ सरकारमध्ये गेल्याने ‘ईडी’ला त्यांचे प्रकरण आठवत नाही. आनंदाचा शिधा, आरोग्य शिबिरे यामध्ये गोंधळ आहे. आरोग्य विभागातील घोटाळा उघडकीस आणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पितळ उघड करणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.




