पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखविल्यानंतर या प्रश्नातून नक्कीच मार्ग निघेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देत “श्रीं’चे दर्शन घेतले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची आरती फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांनी फडणवीस यांचा सन्मान केला. आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले,””पूर्वी जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर तेथेही सुरवातीला पाच वर्ष पुरुषांचाच वावर जास्त होता. पण काही काळ गेल्यानंतर हे चित्र बदलले. संसदेत आत्ता देखील ८५ महिला आहेत, आरक्षणामुळे त्यामध्ये आणखी १०० महिलांची भर पडेल. त्यातूनच महिला अधिक सक्षमपणे काम करतील, हे निश्चित आहे.



