पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) गुण एकत्र करण्याबाबत लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. खासगी शिकवण्यांमुळे विद्यार्थी वर्गात अनुस्थित राहण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी फेस रेकग्निशनद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरीय शैक्षणिक बैठकीनंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना सीईटी आणि बारावीच्या गुणांचा प्रवेशासाठी विचार करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिक्षण विभागात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती तपासण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. त्यासाठी वर्गात कॅमेरे बसवण्याबाबत चाचपणी सुरू आहे. शाळा मान्यतेपासूनची सर्वच प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. तसेच या प्रणालीमुळे शिक्षकांना करावे लागणारे प्रशासकीय काम काही प्रमाणात कमी होईल, असेही केसरकर यांनी सांगितले.y




