मनोज जरांगे पाटील आज ८ जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ४ जून रोजीच्या उपोषणाच्या तारखेत बदल करत ८ जून रोजी केली होती. त्यानुसार आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला. “जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ते अंतवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

 

मनोज जरांगे काय म्हणाले?

“संपूर्ण मराठा समाजाला माझे आवाहन आहे की, आपण शांततेत राहायचं. आमच्या आंदोलनाविरोधात काही निवेदनं जाणीवपूर्वक देण्यात आले आहेत. मात्र, भविष्यात आम्हीही असे निवेदन देऊ. तुमच्या काही रॅली निघतील. मग त्यावेळी आम्हीही अशा प्रकारचे निवेदन द्यायचे का? महाराष्ट्रात रॅली तुम्ही काढणार असाल तर आम्हालाही रहदारीला त्रास होणार आहे. मग तुम्ही तुमची रॅली रद्द करणार आहात का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला