नागपूर : ‘ईडब्ल्यूएस’तील मराठा उमेदवारांना संवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेने (एमपीएससी) पुन्हा शुद्धिपत्रक काढून ही संधी दिली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ती २५ ऑगस्टला होणार आहे. असा आयोगाने निर्णय घेतला.
‘एमपीएससी’ने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धिपत्रक काढल्यानंतरही केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज केला होता. त्यामुळे शेकडो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात असल्याने भविष्यात कायद्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा शुद्धिपत्रक काढले.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून ‘एमपीएससी’ने संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी ९ मे रोजी शुद्धिपत्रक काढून त्यामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू केले. शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे अराखीव किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना ‘एसईबीसी’मधून नव्याने अर्जाची संधी दिली.
तसेच ‘कुणबी नोंदी’च्या आधारे इतर मागासवर्गाचे (ओबीसी) जात प्रमाणपत्र असलेल्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी दिली होती. परंतु, यानंतरही प्रमाणपत्राअभावी केवळ ८३०८ उमेदवारांनीच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यामुळे अजूनही हजारो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गांमध्येच होते. परिणामी, ‘एसईबीसी’ उमेदवारांनी चुकीच्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आक्षेपामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती.



