
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं आता भारतात आणण्यात आली आहे. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे. काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली असून त्यांच्याकडे केवळ विरोध करण्याचं काम बाकी आहे, असे ते म्हणाले. ते साताऱ्यातील ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही. या वाघनखांच्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विरोधकांनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी वाघनखाला होत असलेल्या विरोधावरून विरोधकांनाही लक्ष्य केलं. “उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी वाघनखांवरून वाद करू नका अशी विनंती केली आहे. मात्र, आपल्या देशातील काही लोकांकडे केवळ विरोध करण्याचं काम बाकी आहे. हे लोक उठसूट कोणत्याही गोष्टीला विरोध करतात. हा एक रोग आहे. या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनाही करावा लागला होता. मात्र, या विरोधकांचा सामान करत शिवरायांनी रयतेचं राज्य स्थापन केलं असं ते म्हणाले.
“काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे”
“आज सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केलं, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाखनखं भेट दिली आहे. खरं तर आता या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र, काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. त्या वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज काढण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचं आहे”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“शिवरायांचं नाव घेतल्यावर रक्त सळसळतं”
“आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत, ते आमचा आराध्य दैवत आहेत. ते खऱ्या अर्थाने देव-देश आणि धर्माकरिता लढणारे मावळ्यांचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्ष झाली आहेत. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर रक्त सळसळतं. ही खऱ्या अर्थाने त्यांनी तयार केलेली किमया आहे”, असेही ते म्हणाले.



