माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवे आरोप केले. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा मला बदनाम करण्यासाठी त्यांनी परमबीर सिंह यांच्याशी डील केलं असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी एका ओळीत तो विषय संपवला.
- अनिल देशमुख यांनी आज देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप काय?
“मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना NIA मार्फत अटक होणार होती. त्यावेळेस फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले. असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपांना आधीच सावनेरमध्येही उत्तर दिलं.
- अलिकडच्या काळात मी अनेकांचा लाडका झालो आहे-फडणवीस
“अलिकडच्या काळात मी सगळ्यांचा लाडका झालो आहे. एक पोलीस आयुक्त ज्यांचं राज्य आहे त्या गृहमंत्र्याच्या विरोधात विरोधी पक्षनेत्याच्या सांगण्यावरुन आरोप करुन नोकरी घालवण्यासाठी पुढे येईल का? अनिल देशमुख लपवाछपवी करतात. त्यांच्यावर असलेली केस भाजपाने टाकली नाही, केंद्र सरकारने टाकली नाही. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. माननीय चीफ जस्टिसच्या बेंचने हायकोर्टाने केस टाकली आणि त्यामुळे ते तुरुंगात गेले.” असं देवेंद्र फडणवीस असं म्हणाले.
अनिल देशमुख आता भाजपावर आणि माझ्यावर आरोप करत आहेत कारण त्यांना लोकांकडून सिंपथी मिळवायची आहे. बघा माझ्यावर कसा अन्याय झाला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे पण यांना जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे. यांच्या आरोपांवर बोलणं मी माझ्यासाठी कमीपणा समजतो. साळसूद आणि साव बनून जे फिरत आहेत. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आज त्यांनी अनिल देशमुखांवर एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली.



