
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अदित पवारांच्या जनसन्मान यात्रेपेक्षा सध्या अजित पवारांच्या ‘गुलाबी राजकारणा’ची चर्चा आहे. धुळ्यात जात असताना अजित पवारांचा ताफा अचानक थांबला आणि दादा थेट शेतात गेले. यावेळी त्यांनी शेतात काम करणाऱ्या महिलांची आपुलकीने संवाद साधला.
अजित पवार अचानक शेतात गेले आणि तिथे काम करणाऱ्यांना महिलांना विचारले तुम्हाला माझे नाव माहीत आहे का? तिथे काम करणाऱ्या महिलांनी सांगितले… अजितदादा पवार .. अजितदादा म्हटल्यावर अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. त्यानंतर त्यांनी तिथे असणाऱ्या महिलांना तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? बँक खात्याचा क्रमांक दिलाय ना? 17 तारखेला तुमच्या खात्यात पैसे होतील.. त्या योजनेचा चांगला फायदा घ्या.. त्या योजनेचा चांगला फायदा घ्या.. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या… असे अजित पवार म्हणाले.
तुमचं माहेर कोणतं?… बाळा तुला काय करायचे पुढे? अजितदादांची आपुलकीने विचारपूस
शेतात काम केल्यानंतर महिलांच्या हातांना खड्डे पडले होते. हे दादांच्या नजरेने दोन मिनिटात हेरले म्हणाले कामामुळे तुमचे हात कसे झाले आहे. हाताला घट्टे पडले आहे. तिथे शेतकरी महिलेची मुलगी होती तीला दादा म्हणाले.. बाळा तू काय करते? तुला पाहिजे ते शिक्षण तू घेऊ शकते तुझी फी आम्ही भरणार आहे. तुला IAS, IPS व्हायचं असेल.. तुला ज्याच्यात आवड आहे..त्याचा खर्च सगळा आम्ही करणार आहे.. त्यानंतर एक शेतकरी महिला म्हणाली,मी अपंग आहे पण डॉक्टरांनी फक्त 45 टक्केच अपंगत्व दाखवलय. त्यावर दादा म्हणाले.. सिव्हील सर्जनला जाऊन भेटल्यावर नक्की कळेल किती टक्के अपंगत्व आहे, अशी प्रत्येकाची आपुलकीने दादांनी चौकशी केली.


