
ठाणे : बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. मागच्या आठ तासंपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन तसेच आदर्श शाळेबाहेर आंदोलन करत आहेत. याप्रकरणातील दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली, असा आरोप केला जातो आहे. दरम्यान, याप्रकरणी आता राज्य सरकारने पहिली कारवाई केली असून तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेत सुरुवातीला कारवाई करण्यात तसेच गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
