
राज्यात बदलापूर आणि अकोला येथे घडलेल्या घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय. बदलापूर येथे शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीये. तर, अकोल्यातही काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग करत एक विनंती केली आहे. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेत आलं आहे.
सुप्रिया सुळे यांचं ट्वीट चर्चेत-
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule )यांनी केली आहे.



