महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप केली नाही. मात्र येत्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना लवकरच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सईताई डहाके यांची भेट घेतल्याचे चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे.
दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या सभापती आहेत. तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील आणि डहाके परिवाराचे जावई देखील आहेत. मात्र त्या सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटात आहेत. मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सईताई डहाके यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण प्रकाश डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र डहाके कुटुंबाला उमेदवारी अजित पवार गटाकडून मिळणार कि शरद पवार गटाकडून मिळणार यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दिवंगत प्रकाश डहाके हे सतत कारंजा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटले आहेत. त्यांची 1995 मध्ये कारंजा मतदारसंघाची राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणुक देखील लढविली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांनी तो पराभव स्वीकारून 1999, 2004 मध्ये विधानसभेची निवडणुक लढविली. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये निवडणूक लढवली मात्र त्यावेळी ते केवळ 47 मतांनी पराभुत झाले. यानंतर त्यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 30 हजार 307 मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला आहे.


