
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. महायुतीचे अनेक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे देखील ४५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक प्रमुख नेत्यांसह विद्यमान मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातून पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीमध्ये राजकीय टोलेबाजी केली आहे.
शहाजीबापू यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या खास शैलीतून शहाजीबापूंनी टोलेबाजी केली. संजय राऊतांना कडक शब्दांत सुनावताना शहाजीबापू म्हणाले की, संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असे विधान शहाजीबापू यांनी केले आहे.
रोहित पवार पैसे मोजायला गेले होते का?
पुणे येथे सापडलेले पैसे हे रफिक शेख यांचे होते त्यांनी ते कबूलही केले असून ते मोठे व्यापारी आहेत. त्यांचे पैसे आहेत, अशी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे पैसे एका व्यापाऱ्याचे असताना विनाकारण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार (Rohit Pawar) करीत आहेत. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला. रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षातील दोन भावांचे मनोमिलन झाले, तरी मला याचा कसलाही फरक पडणार नाही. दोन काय तीन-चार किती भाऊ एकत्र आले तरी त्यांच्या आज्या सोबत सात वेळेला मी लढलेलो आहे, त्यामुळे शेकाप वगैरे असा मला कसलाही फरक पडत नाही, असं शहाजीबापू म्हणाले.
