
मुंबई : राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुलभतेची (ईज ऑफ डुइंग बिझनेस) प्रक्रिया आणखी उद्याोगपूरक करावी आणि त्यासाठी महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) असलेल्या तब्बल साडेतीन हजार एकर जमिनीचे येत्या १०० दिवसांत वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. महायुती सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी उद्याोग विभागाचा आढावा घेतला.
बैठकीच्या सुरुवातीला उद्याोग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांनी १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात सादरीकरण केले. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खात्याचे अधिकारी उपस्थित होते. एमआयडीसीकडे सध्या ३ हजार ५०० एकर जमीन उद्याोगांना वाटपासाठी उपलब्ध असून नवीन १० हजार एकर जमीन अधिग्रहणासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुलभता धोरणांतर्गत मैत्री पोर्टल व उद्याोग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ‘एआय चॅटबॉट’ सुविधा देण्यात येणार आहे. तसेच शून्य प्रलंबितता धोरण अवलंबून मैत्री पोर्टलवर आणखी ५० सेवांचा समावेश करण्याची प्रक्रिया १०० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्याोग धोरण, इलेक्ट्रॉनिक धोरण, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, वस्त्रोद्याोग धोरण व एमएसएमई धोरण यात कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता असून यासाठी मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण
उद्याोग व निर्यातीला चालना देण्यासाठी जिल्हानिहाय गुंतवणूक व निर्यात परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दहा हजार नवउद्याोजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरुणांना आंतरवासिता मिळावी यासाठी कार्यक्रम तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील महिन्यात होणाऱ्या ‘दावोस गुंतवणूक परिषदे’च्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यावर भर देतानाच गुंतवणूक प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ऑरिक सिटी, दिघी पोर्ट व बिडकीन औद्याोगिक शहरांमधील पायाभूत सुविधा कामे तातडीने पूर्ण करतानाच जिल्ह्यांमध्ये उद्याोग सेवा केंद्रांचे बळकटीकरणावरही भर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उद्याोग विभागासह अन्य काही मंत्रालयांच्या पुढील १०० दिवसांच्या नियोजनाचा मंत्रालयात आढावा घेतला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे मंत्री, अधिकारी उपस्थित होते.
पारदर्शकतेची अपेक्षा : महाराष्ट्र औद्याोगिक विकास मंडळात भूखंड वाटप हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. भूखंड वाटपात अडवणूक केली जाते, अशी उद्याोजकांची तक्रार असते. या पार्श्वभूमीवर पुढील १०० दिवसांमध्ये साडेतीन हजार एकर उपलब्ध जमिनीचे वाटप करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने भूखंड वाटपात पारदर्शकता येईल, अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे.



