कोल्हापूर : उध्दव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. यामुळे कागल तालुक्यातील राजकारणाचे संदर्भ बदलण्याची चिन्हे आहेत.शिवसेनेकडून यापूर्वी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले संजय घाटगे, त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंबरीश घाटगे यांनी पक्षात प्रवेश केल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. नव्याने प्रवेश केलेल्यांमुळे भाजपा सदस्य संख्या आणखी ५० लाखांनी वाढेल असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कागल व शहापूरच्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबीयांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे बावनकुळे म्हणाले.