
मुंबई- सरकारी शाळांकडे शिक्षणाची गुणवत्ता नसते अशी नेहमीच ओरड केली जाते. त्यामुळे पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळणार नाही असा बहुतेक पालकांचा गैरसमज असतो. या गैरसमजाला छेद देत कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंगरोडवरील रावबहादूर विचारे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कागदावर असलेली शाळा प्रत्यक्षात फुलवली आहे. ही शाळा कोणत्याही दुर्गम भागातील नसून चक्क कोल्हापूर शहरालगतच्या उपनगरातील महापालिकेची आहे. ही शाळा सध्या तालमीत, मंडळाच्या जुन्या हॉलमध्ये आणि बंगलावजा इमारत अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी भरविली जात आहे.
सुरुवातीपासूनच जागेची वानवा : रावसाहेब विचारे यांच्या नावाने सुरू झालेली आणि पटसंख्येमुळे काही वर्षापूर्वी कणेरकरनगर परिसरात स्थलांतर करावी लागलेली ही शाळा फक्त कागदोपत्री अस्तित्वात होती. शिक्षकांच्या आणि माजी शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांच्या पाठपुराव्यानंतर याच परिसरातील व्यक्तीच्या खासगी तीन खोल्या महापालिकेने ताब्यात घेतल्या. सुरुवातीचे काही दिवस एकाच खोलीत दोन-तीन इयत्तांचे वर्ग भरत असत. मात्र, शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे उर्वरित वर्गाना किराणा माल दुकानाच्या दारात, तरुण मंडळाच्या हॉलमध्ये, तालमीमध्ये आशा वेगवेगळ्या ठिकाणी बसून शिक्षण घेण्याची वेळ आली होती.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून शाळेला उभारी : शाळा फुलेवाडी भागात स्थलांतरित झाल्यानंतर पटसंख्या बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र, शाळेच्या शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना पालिका शाळेत मुलांना पाठवण्याची विनंती केली. शिवाय शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुले देखील याच शाळेत शिक्षण घेत असल्याने पालकांना देखील शिक्षकांबाबत विश्वास वाटला. त्यातून शाळेतील विद्यार्थी संख्या वाढत गेली यंदा शाळेत २५२ विद्यार्थी शिकत असून नव्या ५१ विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.
पाठपुराव्याला यश : यावर शिक्षक आणि पालकांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा नियोजनातून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून फुलेवाडी रिंगरोडवरील रावबहादूर विचारे विद्यालयाचे दोन मजली इमारतीच्या बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या कामातच निधी संपल्याने दारे, खिडक्या, फरशी, गिलावा यांची कामे करणे बाकी आहेत. ही कामे केली तरच येत्या शैक्षणिक वर्षात या नव्या इमारतीत शाळा भरवता येणे शक्य होणार आहे.
स्पर्धांमध्ये रावबहादूर विचारे शाळेचे विद्यार्थी पहिल्या पाच नंबरांमध्ये : सरकारी शाळा टिकाव्यात म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांचा महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे महापालिकेनेही प्रस्तावित जागी शाळेच्या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. पालकांनी शाळेवर खूप विश्वास ठेवला. भौतिक सुविधा पेक्षा शैक्षणिक गुणवत्तेला पालकांनी प्राधान्य दिले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर महापालिका स्पर्धा परीक्षा केटीएसमध्ये घवघवीत यश मोलवाले आहे. या स्पर्धांमध्ये रावबहादूर विचारे शाळेचे विद्यार्थी पहिल्या पाच नंबरांमध्ये आहेत. तसेच मंथन परीक्षांमध्ये राज्यात ३ ऱ्या क्रमांकावर शाळेच्या विद्यार्थ्याने स्थान पटकावले आहे. तसेच बीडीएसमध्ये रावबहादूर विचारे शाळेच्या विद्यार्थ्यांनी १६ मेडेल मिळवली आहेत. तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळे शाळेचा पट आता अडीचशेच्या जवळ झाला असून पुढील वर्षी इयत्ता पहिलीच्या ५१ पालकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती माजी मुख्याध्यापक विनोदकुमार गुरुबस भोंग यांनी म्हटलंय.
शाळेच्या बांधकामासाठी ३२ लाख रुपयांची तरतूद : या शाळेच्या उर्वरित कामासाठी ३२ लाख रुपयांची तरतूद यंदाच्या आर्थिक अंदाजपत्रकात केली आहे. त्यानुसार हे काम येत्या काही दिवसांत पुन्हा सुरू करणार आहे. जूनपर्यंत इमारत शाळेच्या ताब्यात देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असंही कोल्हापूर महापालिकेचे उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी सांगितलंय.
