
सातारा – पन्नास वर्षांची राजकीय परंपरा असणाऱ्या कराड दक्षिणमधील उंडाळकर कुटुंबातील ॲड. उदयसिंह पाटील हा युवा नेता शनिवारी हातावर राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ बांधणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांचे ते सुपूत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून अजितदादांना मातब्बर नेतृत्वाची साथ मिळणार आहे. या राजकीय घडामोडीचे भविष्यातील निवडणुकांमध्ये मोठे परिणाम दिसणार आहेत.
विलासकाका उंडाळकरांचा राजकीय वारसा : ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाकांनी पन्नास वर्षे राजकारणात काम केलं. सामान्य कार्यकर्त्यासाठी सत्तेची दारे खुली केली. सलग ३५ वर्षे त्यांनी कराड दक्षिणचं विधीमंडळात प्रतिनिधीत्व केलं. सहकार, विधी व न्याय, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, पुनर्वसन यासारख्या खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले होते. गाव तेथे पाणवठा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, मशिदींना संरक्षक भिंती, ग्रामीण पाणी योजना, पाझर तलावांच्या माध्यमातून जलसिंचनाचा पॅटर्न आणि देशातील पहिला वारणा-कृष्णा नदीजोड प्रकल्पही साकारला. विलासकाकांचा हा राजकीय वारसा घेऊन ॲड. उदयसिंह पाटील आता राष्ट्रवादीत नवी इनिंग सुरू करत आहेत.
बहुतांश संस्थांवर उंडाळकरांचं वर्चस्व : राज्यातील काँग्रेसचा निष्कलंक आणि दिग्गज नेता म्हणून विलासकाका उंडाळकरांची ओळख होती. सातारा जिल्ह्यावर दीर्घ काळ त्यांचं एकहाती वर्चस्व होतं. त्यांच्या कडक शिस्तीमुळंच जिल्हा बँकेला नाबार्डचे अनेक पुरस्कार मिळाले. बाजार समिती, खरेदी विक्री संघ, कोयना दूध संघ, रयत सहकारी साखर कारखाना, कोयना सहकारी बँक या संस्था विलासकाकांच्या नेतृत्वामुळं प्रगतीपथावर गेल्या. या संस्थांची पदे देऊन सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवला. हा वारसा घेऊन त्यांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील राजकारणात कार्यरत आहेत.
पुतण्यानंतर काकाही कराड दौऱ्यावर : ॲड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (१९ एप्रिल) कराड दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात अजितदादा काय बोलणार, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. अजितदादांच्या दौऱ्यानंतर दोनच दिवसांनी (२१ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवारही सह्याद्री कारखान्यावरील विजयोत्सवाला येणार आहेत. काका-पुतण्याच्या या दौऱ्यामुळं सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
