पुणे – एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची होणारी धावपळ बंद होणार आहे. आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने नवीन व्यवस्था सुरू केली आहे. लवकरच ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे.
एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली, की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे वीज कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणकडे ऑनलाइन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येत होती; परंतु या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. नव्या व्यवस्थेमुळे हे हेलपाटे वाचणार आहेत.
अशी असेल नवी पद्धत
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची “आयटी सिस्टिम’ जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला “एसएमएस’ पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. शुल्क भरले की वीज मिटर नावावर होतो आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते.
व्यवस्थेची चाचणी यशस्वी
नव्या प्रक्रियेत वीज मिटर नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे. त्यानुसार ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे.




