मोहम्मद सिराजच्या वादळापुढे लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भारताचे 391 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानाच उतरलेल्या लंकाचा संपूर्ण डाव 73 धावात संपुष्टात आला. भारताने सामना 317 धावांनी जिंकत आपला धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय साजरा केला. भारताकडून मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारताचे 391 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. मोहम्मद सिराजने असलंका फर्नांडोला 1 तर कुसल मेंडीसला 4 धावांवर बाद करत पहिले दोन धक्के दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने चरिथ असलंकला 1 धावेवर बाद करत लंकेची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली. सिराजने लंकेला अवघ्या 4 धावात चौथा धक्का दिला. त्याने नुवानिदू फर्नांडोचा 19 धावांवर त्रिफळा उडवत लंकेची 8 व्या षटकात 4 बाद 35 धावा अशी अवस्था केली.
श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर सिराज आणि शमीने लंकेची अवस्था 5 बाद 37 धावा अशी केली होती. त्यानंतर सिराजने करूणारत्नेला धावबाद करत लंकेला सहावा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने लंकेचा कर्णधार शानकाला 11 धावांवर बाद केले. शमीनेही दुनिथची शिकार करत लंकेची अवस्था 8 बाद 51 धावा अशी केली.
तत्पूर्वी, भारताने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 391 धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी (110 चेंडूत 166 धावा खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 390 धावांपर्यंत मजल मारली. विराटला शुभमन गिलने 116 धावांची शतकी खेळी करत चांगली साथ दिली. रोहित शर्माने 42 तर श्रेयस अय्यरने 38 धावांचे योगदान दिले.




