मंचर: शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके आमदार चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर (ता आंबेगाव ) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी( ता. २६) रोजी सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेशाची जय्यत तयारी सुरू असून आढळराव पाटील यांच्या स्वागतासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत” अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी दिली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील बाणखेंले, रवींद्र करंजखेले ,संतोष डोके ,कल्पेश बाणखेले, नंदकुमार सोनावळे, भाऊसाहेब निघोट ,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विष्णू हिंगे म्हणाले”शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.
त्यामुळे आढळराव पाटील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. भाजपचे कार्यकर्तेही आमच्या सोबत ताकतीने उभे राहणार आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या विचाराचा उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व सर्व मित्र पक्ष एकजुटीने अत्यंत प्रभावी प्रचार यंत्रणा उभी करणार आहेत. यावेळी अरुण गिरे व रवींद्र करंजखेले यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला.
ते म्हणाले”खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांना मदत करणे तर सोडाच पणअनेक गावांचे तोंडही डॉ. कोल्हे यांनी पाहिले नाही. त्यांचा मोठ्या प्रमाणात खासदार निधी खर्च न झाल्याने मागे गेला आहे. निमंत्रण देऊनही अनेक कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे असा ते निरोप देत होते. येथील जनतेने त्यांना शूटिंगच्या कामासाठी पाठवले नव्हते. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आढळराव पाटील गेली पाच वर्ष सतत मतदारसंघ राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर संपर्कात आहेत. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. आढळराव पाटील यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत




