नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकतं माप देण्यात आल्यानं विरोधकांनी चांगलंच रान उठवलं आहे. विरोधकांनी आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ केला. आज जम्मू-काश्मीरच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू राहणार आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि कीर्ती वर्धन सिंह आज कागदपत्रं संभागृहापुढं मांडणार आहेत.
केंद्रीय मंत्री निर्मीला सीताारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोठा भेदभाव केल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार पी चिंदबंरम यांनी केला. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे खासदार पी चिदंबरम यांनी राज्यसभेत आणि काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरुन सत्ताधाऱ्यांवर मोठा हल्लाबोल केला. विरोधकांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वरुन जोरदार हल्लाबोल केला असला, तरी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज रेटून नेण्यात आलं.
आम्हालाही अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार – शशी थरूर
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्प 2024 वर मोठी टीका केली. शशी थरुर म्हणाले की, आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयांचं बजेट कमी करण्यात आलं. त्यामुळे मी त्यांना याचं कारण विचारलं. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. दोन्ही राज्यांना त्यांच्या नेत्यांना संतुष्ट करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. ते कसं काम करत आहेत, याबाबत आम्हाला माहीत आहे. मात्र आम्हाला त्याविरूद्ध निषेध करण्याचा अधिकार आहे. बिहारला इतकं मोठं पॅकेज मिळाल्यानं मला आनंद झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे.




