पुरंदर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानेही तयारी सुरू केली आहे. तर, महायुतीमध्ये शिवसेनेचे (शिंदे) माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात भाजपच्या इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे पुरंदर-हवेलीतील लढत तिरंगी होईल, अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक इच्छुकांनी जोमाने प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातील लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे विद्यामान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात महायुतीमधील शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार विजय शिवतारे यांच्यात होईल, अशी शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि भाजपच्या काही इच्छुकांनीही तयारी केल्याने पुरंदरमध्ये बंडखोरी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचा (शरद पवार) मेळावा दहा दिवसांपूर्वी जेजुरी येथे झाला. त्या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यामान आमदार संजय जगताप यांचे कौतुक करून तेच संभाव्य उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतरही, तालुक्यातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘गेली निवडणूक लढविणार होतो. मात्र, पुढील निवडणुकीत संधी दिली जाईल, असा शब्द दिल्यानेच माघार घेतली होती. या वेळी मात्र लढणारच,’ अशी भूमिका झेंडे यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा बंडाचा झेंडा कायम राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून, संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षापुढे आहे.
महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे) माजी मंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी निश्चित असल्याचे समजले जात आहे. महायुतीमध्ये पुरंदर मतदारसंघ नेहमीच शिवसेनेचा राहिला आहे. त्या दृष्टीने शिवतारे यांनी बैठका आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र, शिवतारे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादीतील (अजित पवार) अनेक इच्छुकांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे.
कोणते मुद्दे निर्णायक ठरणार?
या मतदारसंघातील निवडणूक रखडलेले नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणीचे पाणी, जनाई-शिरसाई उपसा योजना आणि जेजुरी एमआयडीसी विस्तारीकरण या मुद्द्यावर होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम केल्याने संजय जगताप यांना सहज विजय मिळाला होता. मात्र, या वेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे पुरंदरमधील निवडणूकही चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.



